.post img {

Automatic Size

Monday 25 September 2017

निवडुंगाचं प्रेम

"अरे कन्नड चॅनेल काय लावून बसलायस? लक्ष कुठं आहे तुझं आज??"

"काही नाही गं आज्जी. आज थोडा मूड ऑफ आहे."

"ते तर कळतयच. आल्या आल्या आज लॅपटॉप नाही उघडून बसलास. आणि हे कन्नड चॅनेल लावून बसलायस. काय म्हणावं काय तुला. काय झालं पिटु? कुणी काही बोललं का माझ्या बाळाला?"

प्रितम आज खूप दिवसांनी आज्जीकडे आला होता. पुण्यापासून जेम तेम 60 किमी वर त्यांचं मूळ गाव. तिथं आज्जी एकटी राहायची. तिला शहरात राहायला आवडायचं नाही, हे तिचं एकटं राहायचं कारण. गेल्या गेल्या आज्जी ला घट्ट मिठी मारायची आणि कॉलेज मधल्या सगळ्या गमती तिच्याशी शेअर करायच्या हे त्याचं आवडतं काम. आज इकडे यायच्या आधी, श्रद्धाशी कडाक्याचं भांडण झालं होतं. दोघांचं इंजिनिअरिंग संपायला आता फक्त 02 महिन्याचा अवधी राहिला होता. दुधात साखर म्हणजे, दोघांचं एकाच कंपनी मध्ये सिलेक्शन झालं होतं. एकाच ठिकाणी जॉब करणार म्हटल्यावर एकत्र भरपूर टाईम स्पेन्ड करायला मिळणार होता.  त्यांच्या प्रेमकथेचा 3 वर्षाचा काळ म्हणजे इंजिनीरिंग च्या हार्डशिप मधले सुखद क्षण होते. पण आत्ता त्याच्या रागाचा पारा एवढा चढला होता. तिच्याच विचारात गुंग झाला होता. आज्जीची चौकशी टाळावी, म्हणून तो खिडकीतून बाहेर पाहत बसला. घरासमोरची हिरवाई पाहून त्याच्या मनाला नेहमीच एक शांतता लाभायची. पाहता पाहताच त्याने आजीला विचारलं..

"अगं आज्जी, आपल्या घरासमोर एवढी झाडं कुणी लावलीयत गं. ही फणसाची झाडं तर एवढी मोठी आहेत. खूप वर्ष झाली असतील ना?'

आज्जीने तोपर्यंत त्याच्या आवडीची तांदळीची भाजी निवडायला घेतली होती. तिनं तिथूनच उत्तर दिलं.

"तुझ्या आजोबांनी लावलीयत. का रे? मधूनच आज झाडांचा विषय?"

" काही नाही ग सहजच. पण तुला खूप आवडतो ना फणस? अच्छा.. अच्छा.. म्हणजे आजोबांनी फक्त तुला आवडतात म्हणून ही फणसाची झाडं लावलीत ना? प्रेमाचं गिफ्ट?"

"पिट्या काही पण बडबडतोयस काय रे? कॉलेज ची हवा लागलेली दिसतेय. म्हणे प्रेमाचं गिफ्ट."

"अगं पण तसंच असेल तर हरकत काय आहे ना? आजोबांचं प्रेम होतंच ना तुझ्यावर?"

"होतं तर. म्हणजे खूप काळजी घ्यायची माझी. बरं अजून तुझी खाण्याची फर्माईश आली नाही ती? तांदळीची भाजी आहेच. अजून काय करू?"

"आत्ताच तोंडाला पाणी सुटलं बघ. त्यासोबत मस्त भाकरी आणि पिठलं पण कर."

"फक्त अर्धा तास दम काढ. लग्गेच करते."

अजून त्याची नजर अंगणातल्या झाडांचा वेध घेत होती. मनाला चिअर करण्याचा प्रयत्न तर खूप करत होता. पण मनात एकच प्रश्न यायचा. "ती माझ्याशी अशी वागूच कशी शकते? मग एवढी वर्ष इतकं उत्कट प्रेम असल्यासारखं नाटक करत होती का? दोघांचंही भवितव्य किती छान होऊ शकलं असतं एकत्र. नाही खरंच मी ओळखायला चुकलो असेन."

तेवढ्यात आज्जीनं काळजीत विचारलं,

"पिटु आणखी विचारात बुडालास काय रे? नुसताच खिडकीतून बाहेर काय पाहत बसलायस. आज काही वेगळंच गाणं दिसतंय तुझं. काय झालं?"

"काही नाही ग आज्जी. मला एक सांग, आणखी काय काय करायचे आजोबा तुझ्यासाठी?"

आज्जी त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल होती.

" अरे मुळात आमचं लग्न झालं तेव्हा जेमतेम 13 वर्षांची होते. मन ही खूप अल्लड, बालीश होतं. त्यांनी माझ्यासाठी सगळ्यात मोठी ही गोष्ट केली की मला समजून घेतलं त्यांनी. मी जी आज आहे त्यांच्यामुळेच. अगदी जग जरी माझ्या विरुद्ध असेल तरी ठामपणे माझ्या बाजूला उभे असण्याची त्यांची तयारी असायची. अरे मी काय बडबडत बसले इथं. जेवण करायचंय अजून. आणि बोअर झाला असशील ना आज?."

"नाही गं बोअर होत. बोल ना आज्जी तू. किती छान बोलत होतीस."

"बर बाबा सांगते. आज खूप दिवसातून या म्हातारीचे शब्द ऐकायला स्वतःहून तयार आहे. तुझें आजोबा स्वभावाने तसे अबोलच होते, पण त्यांचं जे काही प्रेम आहे ते कृतीतून दिसायचं. कुणी माझा अपमान केलेला सहन नाही व्हायचं. एकदा तर असा काही प्रसंग घडला की, माझ्या आयुष्याची नवीन वाटच सांधली गेली. लग्नानंतरची चौथी - पाचवी दिवाळी असेल. त्यांची मोठी बहीण म्हणजे माझ्या नणंद बाई भाऊबीजेला आल्या होत्या. त्यावेळेस फॅक्टरी बंद पडल्यामुळं त्यांचं कामही सुटलं होतं. परिस्थिती अगदीच जेमतेम होती. नणंदबाईंच्या घरी मात्र जणू लक्ष्मी पाणी भरत होती. त्यांनी मस्त टपोऱ्या मोगऱ्याच्या फुलांचे गजरे विकत घेतले. मला मात्र मोगऱ्याचा गजरा म्हणजे जीव की प्राण होता. मागायला कसतरी वाटत होतं, तरी पण मी नणंद बाईंकडे एक गजरा मागितला. नणंदबाई कुत्सित पणे हसल्या. आणि म्हणाल्या, "अहो वहिनी, दिला असता तुम्हालाही गजरा, पण मला दोन तीन गजरे असले तरच शोभून दिसतात. आणि कशाला सवय करून घेता. आज मी देईन पण दादाला नंतर हे लाड पुरवायला होणार का?" .. पिटु आयुष्यात पहिल्यांदाच कुणाकडे तरी छोटीशी गोष्ट मागायची इच्छा झाली होती. पण त्यांचे ते अपमानास्पद बोल ऐकून काळजात चर्रर्र झालं. डोळे पाण्यानं डबडबणार एवढ्यात मी स्वयंपाक घरात निघून गेले. माझ्या आवडत्या मोगऱ्याचाही मला तिटकारा आला होता आणि नंतर कधीही गजरा घालायचा नाही अशी मनाशी गाठच बांधून ठेवली होती. संध्याकाळी झोपताना माझा उदास चेहरा पाहून ते सतत चौकशी करत होते. पण त्या भावा बहिनीत कलह नको म्हणून काय बोलले नाही. 

पहाटे पहाटे उठले आणि अंगणात सडा टाकायला आले, तेव्हा मला मोगऱ्याचा एक ईवलुसा वेल दिसला.  एक छोटीशी कळी उमलण्याच्या तयारीत होती. मी नकळत खाली बसून त्या कळीला न्याहाळत बसले. तर ह्यांचा मागून आवाज आला. "हा मोगऱ्याचा वेल आणि त्याची येणारी फुलं फक्त आणि फक्त तुझीच आहेत. फक्त ह्याला छान फुलवायची जबाबदारी तुझी." माझ्यासाठी चक्क रात्रीतच कुठेतरी जाऊन तो वेल आणून लावला होता. आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात कुणीतरी सुगंध पेरला होता. मग त्यांनी मला सविस्तर सांगितलं की कालचं त्यांच्या बहिणीचं ते बोल त्यांनी बाहेरूनच ऐकले होते आणि त्यांना ते कदापी सहन होणारं नव्हतं. अरे नंतर तो मोगऱ्याचा वेल इतका फुलला, की मी आजूबाजूच्या मुलींना पण ती फुलं द्यायचे. त्यांना माझ्या आयुष्यात फक्त 10 वर्ष सोबत करता आली, काळाला हे दृष्ट लागण्याजोग आयुष्य बघवलं नव्हतं. पण या कालावधीत त्यांनी मला शिक्षण पूर्ण करायला लावलं. मी त्यावेळची मॅट्रिक पूर्ण करून शिक्षिका झाले स्वतःच्या पायावर उभी राहिले. एकदा त्यांचा मित्र त्यांना मस्करीत म्हणाला, "अरे तू असा अडाणी कामगार आणि तुझी बायको तर मास्तरीन आहे की रे. अशी कशी जोडी तुमची? तू निवडुंग आणि वहिनी म्हणजे मोगऱ्याचा वेल".. त्यावर ते फक्त हसले. मी त्यांच्या मित्राला म्हटलं, "भाऊजी, निवडुंग साधा आणि काटेरी असला तरी त्याच्या मुळंच त्या मोगऱ्याच्या वेलीचे रक्षण आणि जपणूक होते. त्याला त्याचं श्रेय मिळालं नाही तरी तो त्या मोगऱ्याच्या सुगंधातच खूष असतो. असे आमचे हे आहेत. आज मी जी काही आहे ते त्यांच्या जपणुकी मुळं." पिटु त्यावेळी आयुष्यात पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहिले होते. आणि ते आनंदाचे होते, कारण नकळत मी त्यांना त्यांच्या आयुष्याचा अर्थच सांगितला होता.

प्रितमला आजीचं बोलणं ऐकून श्रद्धाची आठवण झाली. काल त्यांचं भांडण झालं ते मुळीच तिच्या एका निर्णयामुळे. तिला कॅम्पस सिलेक्शन मधून मिळालेला जॉब न करता दिल्ली मधल्या एका स्पोर्ट्स क्लब मध्ये 2 वर्षाचा बॅडमिंटन कॅम्प जॉईन करायचा होता. तिला बॅडमिंटन मध्येच करिअर करायचं होतं आणि त्यातून त्यांच्या वाटा खूप वेगळ्या होणार होत्या. म्हणजे तिनं चक्क दोघांच्या एकत्र आयुष्या ऐवजी तिचा स्वार्थ निवडला होता. तिची इच्छा होती की त्यानं तिला यात सपोर्ट करावा. पण त्याला तर खूप राग आला होता. तिला नको नको ते बोलला होता. कधीही अपेक्षित नसलेला ब्रेकअप चा शब्द उच्चारला होता. ती खूप रडली. पण त्याला तो मेलोड्रामा वाटला होता. तसाच तो तडक आज्जी कडे निघून आला.

त्याचं लक्ष ताळ्यावर आलं. आजी अजून खिडकीतून बाहेर पाहत होती. जणू काही ती वेगळ्याच विश्वात हरवली होती. त्यानं तिला मुद्दाम हाक दिली नाही.

तेवढ्यात आजीचे शब्द कानी आले. "माहिती नाही कसे पण या खिडकीत उभा राहिले की अजून त्या मोगऱ्याचा सुगंध येतो. पिटू तुला येतो का रे इथे सुगंध?" 

बोलता बोलता आजीच्या डोळ्यात अश्रू आणि ओठांवर हलकेसे हसू पण होते. प्रीतम ला माहिती होते की आजी आता वेगळ्याच जगात आहे. त्याने आजीला घट्ट मिठी मारली. आज खूप दिवसातुन त्यालाही हुंदका आला होता.

"आजी मला नाही येत गं मोगऱ्याचा सुगंध. तुला तो येतो, कारण तो तुझ्या हृदयात आहे. आम्हा मुलांना खऱ्या प्रेमाचा अर्थ कळण्यासाठी अश्या गोष्टी खरंच कळायला हव्यात. एकमेकांसाठी केलेला त्याग हे पण प्रेमच असतो हे विसरून गेलोय. मी जरा बाहेर जाऊन येतो. मला सुद्धा माझ्या मोगऱ्यासाठी निवडुंग बनावं लागेल. मी आज संध्याकाळी झोपायला इकडेच येईन. आणि तुला माझी पण लव्ह स्टोरी सांगेन."

आजीने हसत त्याच्या गालाचा मुका घेतला. त्याने लपवलं असलं तरी त्याची लव्ह स्टोरी तिच्या नजरेतून सुटली नव्हती. श्रद्धाला त्याने पहिल्यांदा आज्जीला मैत्रीण म्हणून भेटवलं होतं, त्याच वेळी आज्जीला ते उमगलं होतं.

प्रितम पळतच बाहेर गेला. त्याला त्याचं प्रेम गमवायचं नव्हतं. त्याला माहिती होतं की श्रद्धा त्याची वाट पाहत आणि रडत नेहमीच्या भेटीच्या ठिकाणी थांबली असेल.



No comments:

Post a Comment