.post img {

Automatic Size

Thursday 18 April 2019

हृदयातील वाटाड्या - २

(आपल्या आयुष्याची वाट तयार करणाऱ्या आई वडील, शिक्षक तसेच तीच वाट आपल्या काळजीने आणखी सुंदर बनवणाऱ्या पत्नीस आणि त्या प्रवासात चेष्टा मस्करी करून मजा आणणाऱ्या मित्रांसाठी हा लेख...)

लेखक - विशाल पोतदार
भ्रमणध्वनी-9730496245
Email id- vishal6245@gmail.com


वाटाड्याच तो...
जशी तो वाट दाखवू शकतो तशीच वाट लावूही शकतो.
कुणी काट्याकुट्यातून तर कुणी पायघड्या टाकलेल्या रस्त्यावरून नेईल तुला. तो जर काट्याकुट्यातून घेऊन गेला म्हणून दुश्मन असेल असे नाही आणि फुलांच्या पायघड्यावरून नेले म्हणून तो सच्चा मित्रच असेल असेही नाही. तिथं तुझ्या वाटाड्याचं मन किती खरं आहे हे महत्त्वाचं.

एखादा तुला नुसती वाट सांगेल आणि अगदी रस्त्याचा लेखाजोखा तुझ्यासमोर सादर करेल तर कुणी तुला त्या रस्त्यात पावलो पावली सोबत करेल. आयुष्यात तुला ठीक ठिकाणी पोहचवणारे लोक भेटतील. कुणी भक्तीचा अमृतानुभव देण्यास मंदिरात पोहचवेल तर कुणी नशेत साथीदार शोधत मदिरे पर्यंत नेईल. आणि हो, कुणीतरी पाठीत विश्वासघाताचा विखारी खंजीर खुपसून देवाघरी पाठवेल. विचार कर ना, मग किती महत्वाचा असतो वाटाड्या..!!

आधीच तयार असलेल्या वाटेवरून कसं जायचे हे सांगणारे सज्जन भेटतील पण जर वाटच अस्तित्वात नसली तर तुझ्यासाठी ती तयार करणारा तो अवलीया गर्दीतून आपसूक बाहेर येतो फक्त तुझ्याखातर. म्हणजे असं की, नदीच्या पैलतीरी ते ठिकाण आहे असं सांगण्यापेक्षा तो अवलीया होडी वल्हवत तुला पैलतीरी घेऊन येईल.

आयुष्यात कैक येऊन गेले आणि येतीलही असे वाटाडे. तुही निसंकोचपणे विचार त्यांना वाट आणि जर ते सोबत करत असतील तर जरूर दे  त्याच्या हाती तुझा हात. फक्त त्याआधी एक कर. सजगपणे त्याच्या हृदयाचा एकवार ठाव घे. कारण त्याचं सुप्त, स्वार्थी ईप्सित असेल तर आयुष्यभर राहशील मींधेपणाच्या चक्रव्युहात. पण जर त्याचं मन असेल सुंदर लख्ख प्रकाशाने भरलेलं तर मग झोकून दे स्वतःला त्या वाटेवर एक कवडसा बनून.

कारण वाट ही नेहमी सुरू होते हृदयातून..
मग ती रणरणत्या उन्हातून जावो की गर्द वनराईच्या सावलीतून, मंजिलीची ओढ संपुन प्रवासावर प्रेम जडेल. तुझे मन जीवनाच्या त्या संध्याकाळीसुद्धा डुबणारा सूर्य, खळ खळ वाहणारी नदी  आणि परतीच्या पक्षांचा चिवचिवाट अनुभवेल. सगळं काही निरव आनंदघना सारखं भासेल.

पण स्वप्नपूर्ती झाल्यावर आता त्या वाटाड्याला विसरू नको. त्यालाही आता परतीची वाट धरायची हुरहूर लागेल. तो परतायच्या आधी त्याचा हात घट्ट धर आणि  हक्कानं सांग की,

"परतीची वाट एकत्रच सांधू..."
मंजिल महत्वाची नव्हतीच मुळी..
महत्वाचा होता तो तुझ्या सोबतचा अविस्मरणीय प्रवास...
तू सोबत असशील तर अशा किती वाटा आणि किती मंजिली.. !!

No comments:

Post a Comment